‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.
त्यांनी लंडनसह म्हटले होते. कारण लंडनमधील आजीबाई वनारसे ह्यांच्या खानावळीत अनेक मराठी माणसे जेवायला यायची. ऑक्सफर्ड, केम्ब्रिजची मराठी मंडळी इथे जमायची. इंदिरा गांधी आजीबाईंच्या घरी आल्या आणि ‘self-made woman’ असे म्हणून कौतुक केले. स्वामी चिन्मयानंद, स्वामी प्रभुपाद, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर हे आजीबाईंच्या घरी यायचे आणि पु. ल. देशपांडेही लंडनला गेल्यावर आजीबाईंच्या खानावळीत जेवायला जात.
अशिक्षित असलेल्या आजीबाईंनी लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या, लंडनमध्ये मंदिर बांधलं; पण हा प्रवास अत्यंत खडतर होता. राधा डहाके हे आजीबाईंचं नाव. विदर्भातील सावतेली समाजात त्यांचा जन्म झाला. पुढे दोनदा वैधव्य आलं. दारिद्र्याचे दशावतार अनुभवले. नशिबाने त्यांना लंडनमध्ये नेऊन सोडलं.
लंडन हे गावाचं नाव आहे, की देशाचं हे त्यांना माहीत नव्हतं. ना लंडनची भाषा येत होती, ना तिथली संस्कृती माहीत होती. तरीही त्यांनी खानावळ कशी सुरू केली, लंडनच्या दुकानातून सामान कसे आणायच्या, दुकानदारांशी खाणाखुणा करून कशा बोलायच्या आणि त्यांनी लंडनमध्ये इमारत कशी विकत घेतली हा सगळा प्रवास वाचायचा, तर लेखिका सरोजिनी वैद्य ह्यांचे ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ हे पुस्तक वाचायला हवे आणि संग्रहीसुद्धा ठेवायला हवे.
दारिद्र्य, उपासमार, वैधव्य, मुलींची जबाबदारी, परकीय देश अशा अनेक अडचणी त्यांनी सहन केल्या आणि प्रचंड कष्टाच्या बळावर लंडनमध्ये मानाचे स्थान मिळवले. आपला धर्म, जीवनपद्धती, आपली माणसे जोडण्याची कला, देवावर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या आजीबाई गेल्या तेव्हा लंडनच्या मेयरने श्रद्धांजली वाहिली होती.
आपला जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन सकारात्मक करायचा असेल, तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
- निरेन आपटे